सावित्रीबाईंच्या जयंतीदिनीच
अंगणवाडी सेविकांचे धरणे
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
मुंबई ः देशभरात मंगळवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत असतानाच मुंबईतील आझाद मैदानात सावित्रीच्या लेकी अर्थात अंगणवाडीसेविका हजारोंच्या संख्येने त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करत होत्या. मुंबईत रात्री गारठा असला तरी दिवसा मात्र कडक उन्ह असते. त्यामुळे सावित्रीच्या लेकी त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी तळपत्या उन्हात ठाण मांडून होत्या. आजही त्यांचे आंदोलन सुरू होते.
मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशमध्ये मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. काल (३ जानेवारी २०२३) त्यांच्या जन्मदिनीच राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सावित्रीबाईंचे मुखवटे धारण करून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील आणि सरचिटणील ब्रुजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धरणे धरून बसल्या होत्या. मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे धरणार असल्याचा त्यांचा निर्धार आहे.
प्रलंबित मागण्या आजही धूळ खात पडून
बहुतांश अंगणवाडीसेविकांनी सावित्रीबाई फुले यांचा कागदी मुखवटा धारण करून धरणे आंदोलनात सहभाग घेतला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होईपर्यंत अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे.अंगणवाडीसेविकांनाच मदतनीसाची कामे
राज्यात सुमारे १३००० मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. त्यांना मदतनीस नसल्याने अंगणवाडी केंद्राची सर्व कामे एकटीलाच करावी लागतात. मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा ५,९०० रुपये वेतन मिळते. त्यांना अंगणवाडी सेविकांप्रमाणेच मानधन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
मुख्य मागणी : मानधनात वाढ
राज्य सरकारकडून पिळवणूक
देशभरातील तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, केरळ व इतर राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जास्त मानधन मिळते. परंतु महाराष्ट्रात हे प्रगतिशील राज्य असूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमी मानधन देऊन त्यांची पिळवणूक राज्य सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला.
मोबाईल बंद
पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत २०१९ मध्ये राज्यातील १,०५,५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. सदर मोबाईलच्या वॉरंटीचा दोन वर्षांचा कालावधी मे २०२१ मध्येच संपला. त्यामुळे हजारो मोबाईल नादुरुस्त व बंड पडलेले आहेत. त्यामुळे सेविकांन अहवाल देणे अशक्य झाले आहे. त्यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवरून अहवाल पाठविण्याची सक्ती करण्यात येत आहे. त्यांना त्वरित नवीन मोबाईल देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे.

