मुंबईत उद्यापासून
१० टक्के पाणीकपात
मुंबई, दि. ३० : गेले आठ दिवस मुंबई मुसळधार पाऊस कोसळत असला, रस्तोरस्ती पाणी तुंबले असले, तरी मुंबईकरांच्या घशाची कोरड कायम राहणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने आणि जलसाठ्यात आवश्यक वाढ झाली नसल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीची आफत ओढवली आहे. उद्या १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी वाया जाऊ न देता, ते जपून वापरण्याची आवश्यकता आहे.
या वर्षी पावसाळ्यास बराच विलंब झाला असून महाराष्ट्रात पावसाचे उशिरा आगमन झालेले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्याबाबतचे अनुमान वर्तवण्यात आलेले आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने शनिवार दिनांक १ जुलै २०२३ पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील १० टक्के कपात लागू राहणार आहे.
यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्क्यांनी कमी पावसाची नोंद झाली आहे.
संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त १ लाख ५७ हजार ४१२ दशलक्ष लिटर एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये शनिवार १ जुलै २०२३ पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे.
पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणीवापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.