-
शरद पवार यांचे अनुभवाचे बोल
-
पंचनामे करण्यासही विलंब
-
मदतकार्य ठप्प होण्याचा धोका
-
शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता
मुंबई : राज्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि अन्य पीडितांना मदत करण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे अतोनात गर्दी होत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी सरकारी यंत्रणांचे लक्ष राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी हे अनुभवाचे बोल व्यक्त केले आहेत. राज्याचा प्रमुख असताना मुंबई बॉम्बस्फोट, लातूरचा भुकंप यासारखी अस्मानी-सुलतानी संकटाची परिस्थिती शरद पवार यांनी जवळून पाहिली आणि हाताळली आहे.
संकटाची व्याप्ती खूप मोठी
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाही, तर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. माणसे वाहून गेली आहेत. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. अतिवृष्टीने केवळ शेतकरीवर्ग बाधित झाला नसून त्याची मोठी झळ गावातील लहान-मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसली आहे. एकंदरीत गावांमधील बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे अरिष्ट कोसळले आहे.
रोगराई पसरण्याचा धोका
गावपातळीवर इंधनाचा आणि अन्नाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान करण्याची आवश्यकता आहे. रोगराई पसरण्याची शक्यता असून त्यास आळा घालून आरोग्याच्या सुविधा देखील तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील विपरीत परिणाम झाला असून त्याकडे त्वरेने लक्ष द्यावे लागेल.
मदतकार्य ठप्प होण्याचा धोका
दरम्यान, पिडीतांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची अतोनात गर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पंतप्रधानांनाही रोखले
लातूर भूकंपावेळी पंचनामे व मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्याचा प्रमुख ह्या नात्याने मी लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले होते. एवढेच नव्हे तर इतर नेते व दस्तुरखुद्द प्रधानमंत्र्यांना देखील काही दिवस भूकंपग्रस्त भागात दौरा करू नये अशी विनंती केली होती, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
शासकीय यंत्रणांच्या पाठीशी उभे राहा
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा व्याप पाहता पंचनामे वेळेत करुन योग्य मदतकार्य सुरु व्हावे यासाठी आपत्तीग्रस्त भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त मनुष्यबळ व महसूल, कृषी, पाटबंधारे व इतर शासकीय अधिकारी यंत्रणा तातडीने पाचारण करणे आवश्यक आहे. राज्याचा प्रमुख असताना मुंबई बॉम्बस्फोट, लातूरचा भुकंप यासारखी अस्मानी-सुलतानी संकटाची परिस्थिती जवळून पाहिली आणि हाताळली आहे. अशा भयानक संकटात सापडलेली हजारो घरे व कुटूंबे पुन्हा उभी करण्यासाठी शासकीय यंत्रणेचे योगदान मोलाच होते आणि अशा प्रसंगी शासकीय कर्मचारी स्वतःला झोकून देऊन काम करतात हे महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणेने अनेकदा सिद्ध केलेले आहे. फक्त तिच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. या प्रसंगी राज्यसरकार पिडीतांना दिलासा देण्याचे, त्यांना पुन्हा सक्षम करण्याचे काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असेही पवार यांनी म्हटले आहे.